आदर्श गाव पाटोद्याच्या
राजकारणातून भास्करराव पेरे पाटील बाद, निवडणुकीत संपूर्ण पॅनलचा धुव्वा..
(विशेष प्रतिनिधी-दिलीप परदेशी)
औरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श गाव अशी ओळख असलेल्या पाटोदा गावाच्या राजकारणाने कुस बदलली आहे. गेली तीस वर्षे पाटोद्याच्या राजकारणावर एक हाती सत्ता असलेले भास्करराव पेरे पाटील यांच्या पॅनेलचा ग्रामपंचायत निवडणुकीत धुव्वा उडाला असून त्यांची मुलगीही या निवडणुकीत पराभूत झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचे हे निकाल भास्करराव पेरे पाटलांना जबर धक्का देणारे आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हळूहळू हाती येऊ लागले आहेत. सगळ्यांचे लक्ष असलेल्या पाटोदा ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला असून या निकालाने भास्करराव पेरे पाटलांना जबर धक्का दिला आहे. या निवडणुकीत त्यांच्या पूर्ण पॅनलचा धुव्वा उडाला आहे. आदर्श गाव पाटोद्यात सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या पॅनेलचा दारूण पराभव झाला आहे. मुलीसह तीन जागी पेरे पाटलांचे उमेदवार पराभूत झाले आहेत.
पाटोदा ग्रामपंचायतीत ११ सदस्य असून ८ जागा पेरे पाटलांच्या विरोधी पॅनेलने आधीच बिनविरोध मिळवल्या होत्या. तीन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भास्करराव पेरे पाटलांच्या पॅनेलचे तीनही उमेदवार पराभूत झाले आहेत. त्यात त्यांच्या मुलीचाही समावेश आहे.
पाटोदा ग्रामपंचायतीच्या ११ पैकी ११ जागा कपिंद्र पेरे पाटील यांच्या पॅनेलच्या ताब्यात गेल्या आहेत. त्यामुळे आता पाटोदा गावात तीस वर्षांनंतर नवा सरपंच आणि नवे कारभारी पहायला मिळणार आहेत. तब्बल तीस वर्षांनंतर भास्करराव पेरे पाटील पाटोद्याच्या राजकारणातून बाद झाले आहेत.