जळगाव- जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे कृषि विभागाचे आवाहन

0
174

आरोग्यदुत
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
दि,29/6/२०२१
जळगाव- जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी

पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे कृषि विभागाचे आवाहन
जळगाव-राज्यातील पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येऊन उत्पादकतेची वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन नवीन उमेदीने अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. त्याचबरोबर कृषि उत्पादकतेमध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकुण उत्पादनात मोलाची भर पडेल हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
पिक स्पर्धेत खरीप हंगामात तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी) तुर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफूल (11 पिके) अशी 11 पिके समाविष्ठ आहेत. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख खरीप हंगामासाठी मुग व उडीद या पिकांसाठी 31 जुलै, 2021 असून भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी) तुर, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या पिकांसाठी सहभागाची अंतिम तारीख 31 ऑगस्ट, 2021 अशी आहे.
पिक स्पर्धेत पिकाची निवड करताना पिकनिहाय तालुक्यातील संबधित पिकाखालील क्षेत्र किमान 1 हजार हेक्टर असावे. स्पर्धक संख्या सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5 असावी. पीकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे शेतावर त्या पिकाखालील किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
बक्षिसाचे स्वरुप
तालुका पातळीवर पहिले बक्षिस रुपये 5 हजार, दुसरे बक्षिस रुपये 3 हजार तर तिसरे बक्षिस रुपये 2 हजार आहे. जिल्हा पातळीवर पहिले बक्षिस रुपये 10 हजार, दुसरे बक्षिस रुपये 7 हजार तर तिसरे बक्षिस रुपये 5 हजार असून विभाग पातळीवर पहिले बक्षिस रुपये 25 हजार, दुसरे बक्षिस रुपये 20 हजार तर तिसरे बक्षिस रुपये 15 हजार रुपये आहे. राज्य पातळीवर पहिले बक्षिस रुपये 50 हजार, दुसरे बक्षिस रुपये 40 हजार तर तिसरे बक्षिस रुपये 30 हजार रुपये आहे.
तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पिक स्पर्धेत सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी, पंचायत समिती यांच्याशी संपर्क करण्यात यावा. असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.