बुलडाणा- संततधार पावसामुळे खडकपूर्णा धरणात 80.15 टक्के जलसंचय झाला असून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रसानाकडून देण्यात आला आहे. दरम्यान नदीकाठावरच्या गावातील नागरिकांनी सावधानी बाळगण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णा धरणाची पातळी 519.85 मीटर असून सध्या या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने 80.15% इतका जलसाठा उपलब्ध झाला आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याची आवक वाढली तर खडकपूर्णा धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी पूरनियंत्रणाकरिता उघडावे लागतील. त्यामुळे पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अनुषंगाने नदीकाठावरील नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा खडकपूर्णा प्रकल्प व्यवस्थापनाने दिला आहे.