आरोग्यदुत न्युज
युवराज राजपुरे
नाशिक जिल्हा (प्रतिनिधी)
अज्ञातांनी लावलेल्या आगीमुळे घोटी जवळील डोंगरावरील पाच हजार वृक्ष खाक.
कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी.
घोटी वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन करण्यात अग्रेसर असलेल्या घोटीतील धरणीमाता वृक्ष संगोपन फाउंडेशन ने घोटीजवळील डोंगरावर लागवड केलेल्या तब्बल पाच हजार वृक्ष अज्ञात व्यक्तीने डोंगराला लावलेल्या आगीत खाक झाले असल्याने वृक्षप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.दरम्यान या डोंगराला आग लावू नये यासाठी शासनस्तरावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी धरणमाता वृक्षसंवर्धन फाउंडेशननी केली आहे.
याबाबत वृत्त असे की,घोटी शहराजवळ न्हायडी नामक डोंगर असून वनविभागाच्या अखत्यारित येणाऱ्या या डोंगरावर हरितक्रांती आणण्यासाठी घोटीतील धरनीमाता वृक्षसंवर्धन फाउंडेशन गेली काही वर्षांपासून मेहनत घेत आहे.वृक्षलागवडी बरोबर वृक्षसंवर्धन करण्यासाठी फाउंडेशनच्या वतीने डोंगरावर पाणी नेऊन ठिबक द्वारे वृक्षांना पाणी दिले जाते.
दरम्यान यावर्षीही मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली असताना काही अज्ञात समाजकंटकांनी या डोंगराला आग लावल्याने तब्बल पाच हजार झाडे खाक झाली आहेत.
दरम्यान याबाबत धरणीमाता वृक्षसंवर्धन फाउंडेशनचे पदाधिकारी धीरज गौड,राजू राखेचा,संतोष वाकचौरे,संजय देशपांडे,विनायक शिरसाट, पूनम राखेचा आदी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन शासनस्तरावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करणार असल्याची माहिती धीरज गौड यांनी दिली.